20 नोव्हेंबर रोजी मतदान

मुंबई (प्रतिनिधी)- केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या उपस्थितीत आज झालेल्या पत्रकार परिषदेत आज महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यात विधानसभेसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे दरम्यान, निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक तारखांची घोषणा केल्याने आजपासून राज्यात आदर्श आचारसंहिताही लागू झाली आहे.
यावेळी पत्रकार परिषदेत माहिती देतांना केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस 29 ऑक्टोबर हा असेल, तर 30 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात येणार आहे. उमेदवारांना 4 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असणार आहे.
महाराष्ट्रात एकूण 9.63 कोटी मतदार आहेत, त्यापैकी 4.98 कोटी पुरुष मतदार आहेत तर 4.66 कोटी महिला मतदार असून राज्यात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. यामध्ये 234 सर्वसाधारण मतदारसंघ असून 25 मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी तर 29 मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत.
दरम्यान, राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन प्रमुख प्रादेशिक पक्षांमध्ये पडलेल्या फुटीनंतर होत असलेली ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या नावांनी तयारी झालेल्या नव्या राजकीय समीकरणांचाही या निवडणुकीत कस लागणार आहे. त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक चांगलीच रंगतदार ठरणार असून यामध्ये कोण बाजी मारणार, याबाबत देशभरात उत्सुकता आहे.
काय आहे नियमावली
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना त्यांची पार्श्वभूमी तीनवेळा वृत्तपत्रात द्यावी लागेल. आम्ही जेव्हा महाराष्ट्रात बैठका घेतल्या तेव्हा आम्ही त्यासंदर्भातले कठोर निर्देश आम्ही राज्य निवडणूक आयोग आणि इतर अधिकार्यांना दिल्या आहेत. असंही राजीव कुमार यांनी सांगितलं आहे. निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव आहे. त्यात सर्व मतदारांचा सहभाग आवश्यक आहे.
महाराष्ट्र विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस 29 ऑक्टोबर
तर 30 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जांची छानणी
20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया
23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी